वाढदिवसाच्या तुला मनापासून खूप सार्या शुभेच्छा! तुझ्या आनंदी आणि हेल्दी आयुष्यासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना केली आहे आणि करत राहीन.
तुझ्या वाढदिवसाच औचित्य साधून तुझ्यासाठी काहीतरी लिहिण्याचा मूड झाला माझा आणि मी लिहायला बसलो. पण नेमक काय लिहावं आणि नेमकं कुठं सुरु करून कुठे थांबावं हा मोठा प्रश्न पडलाय मला. तरीही प्रयत्न करून बघतो.
हे कधी, कसं, कुठे, कुणामुळे सुरु झालं काही कळलच नाही. अचानक भर उन्हाळ्यात येणाऱ्या अवकाळी पावसा सारखी तू माझ्या आयुषात आलीस आणि माझ्या ओसाड जीवनात थोडासा गारवा देऊन गेलीस. सदैव बंद असणाऱ्या माझ्या मनाचे दार तू अगदी मला न विचारताच उघडून अलगद आत जावून बसलीस. कुठे शिकलीस ही कला?
माझ्या मनात काय सुरु आहे हे देखील तुला माझ्या ओठांवर येण्या अगोदरच समजू लागले! मनकवडी झालीस तू!
तुझ्या डोळ्यांत बघणं मी मुद्दाम टाळत होतो! अगदी पहिल्यापासूनच! कारण तुझ्या त्या करारी नजरेत मला बुडवून घेण्याच सामर्थ्य होतं. आणि खरं तर मला भीती होती कि मी जर त्या डोहात बुडलो तर मला त्यातून कुणीही बाहेर नाही काढू शकणार! अगदी मला देखील ते अशक्यच होतं.
मेंदू आणि हृदय हे एकमेकांचे शत्रू असावेत. मेंदू जे करू नको म्हणेल तेच हृद्य करून बसते. आपलं बोलनं वाढलं, आपल्या भेटी वाढल्या. तुझ्या एका भेटीसाठी हजारो मैलांचा प्रवास अगदी क्षुल्लक वाटू लागला. तुझ्या सोबत काही तास घालवण्यासाठी जीव धडपडू लागला. सागराला नेमकं उधान यायला आणि मृग नक्षत्र सुरु व्हायला गाठ पडावी तसं काहीसं आपलं झालं. आपली वर्षभराची मैत्री आता एका वेगळ्या वळणावर येऊन थांबली. ते वळण पार करून गेलो तर दोन शक्यता जाणवू लागल्या. कदाचित प्रेमाचा नवीन प्रवास सुरु तरी सुरु होईल किंवा मग सुखद मैत्रीचा अंत तरी होईल. एकमेकांना मनसोक्त बोलल्याशिवाय दिवस जाईनासा झाला. अगदी सकाळी उठल्यावर गुड मोर्निंग पासून, ब्रेकफास्ट, लंच, दिनर ते गुड नाईट पर्यंतचे अपडेट्स एकमेकांना देऊ लागलो. फोनवर बोलण्यासाठी रात्र कमी पडू लागली. दोघांचे सारे सिक्रेट्स जे कि जगातील कोणत्याही व्यक्तीला माहिती नाहीयेत ते आपण एकमेकांना शेअर केले. ते देखील स्वत:हून! थोडासा दुरावा देखील मनाला अस्वस्थ करू लागला. जेव्हा तुझ्या मनाचा अंदाज घेतला तेव्हा तू देखील त्याच वळणावर येऊन त्याच दोन शक्यता मनात घेऊन थांबली आहेस असं जाणवलं.
दोघानाही कळून चुकलं होतं कि आता आपण मैत्रीची रेषा ओलांडतो आहोत. आणि तू शेवटी विचारलस, “आपण प्रेमात तर नाही ना पडलो?” तुझ्याकडूनच हा प्रश्न आल्याने माझं मन थोडं हलकं झालं! तुझ्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देण्याचं काही कारण नव्हतंच, पण “हो” म्हणण्याची डेअरिंग देखील माझ्यात नव्हती.
अजूनही आठवतो आपला तो फोन वरचा पूर्ण संवाद!
“सांग ना, आपण छान फ्रेंड्स आहोत, आपल्याला इतरही छान फ्रेंड्स आहेत, त्यांच्याविषयी असं कधीच नाही वाटलं, पण तुझ्याशिवाय एक क्षण देखील करमत नाही. आपण एकमेकांच्या प्रेमात तर नाही न पडलो?”
“तुला काय वाटतं?” तुझ्या मनाचा अंदाज घेत मी.
थोडासा पौझ घेऊन, “मला वाटतं आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय!” तू.
हे देखील तुझ्याकडूनच ऐकायला मिळाल्याने माझं मन अगदी ढगात जावून बसलं!
“बहुतेक. कारण आपला दिवस सुरु होतो एकमेकांपासून आणि संपतो देखील एकमेकांसोबतच. तुझ्या प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीचे तुझ्याकडे अपडेट्स असतात. असा एकही दिवस मागच्या वर्षात नाही गेला कि आपण त्या दिवशी बोललो नाही. दोघांच्या आवडी-निवडी जरी सारख्या नसल्या तरी त्या एकमेकांना माहिती आहेत. दोघांचे चांगले-वाईट गुणही एकमेकांना माहिती आहेत. दोघंही मनसोक्त भांडतो आणि मग तितक्याच प्रेमाने एकमेकांना समजावून सांगतो. दोघानाही आता स्वत:पेक्षा एकमेकांची जास्त काळजी वाटते, प्रेम यापेक्षा जास्त काही वेगळे नसावे! होय, आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय, आणि आज नाही, तर खूप पूर्वी. फक्त आता त्याची जाणीव झालीय आपल्याला!” मी.
तर अशा प्रकारे, आपण प्रेमात पडलोय ते एकदाचं कन्फर्म झालं! इतर कपल्स सारख आपल्यात काही घडलंच नाही. ना फॉर्मल प्रपोज, ना लव लेटर ना कुठला प्रसंग! पण प्रेमात मात्र पडलो खरं!
आता ओढ लागली ती त्या हजारो मैलांच्या प्रवासाची आणि तुझ्या भेटीची. माझ्या पहिल्या-वहिल्या प्रेयसीच्या भेटीची!
गारठा हिवाळा. रात्रीची बस पकडून १४ तासांच्या प्रवासानंतर अगदी सकाळी तुझ्या शहरात मी दाखल, तू अजून पहाटेची गोड स्वप्न बघत झोपलेली, मी माझ्या मित्राकड जावून त्याला भेटून नंतर हॉटेलवर राहण्याचं माझं ठरलेलं, पण तुझ्या शहरात येऊन पहिल्यांदा तुला न भेटन, माझ्या मनाला पटलं नाही!
सकाळी ७ वाजता दाट धुक्यात, तुझा तोंडी सांगितलेला पत्ता आठवून, रिक्षा तिकडे वळवली. तुला फोन लावला आणि तुला बोलावून घेतलं, तू डोळे चोळत खाली आलीस. पहिल्यांदा माझ्या प्रेयसीला भेटतोय, ते पण अंघोळ न करता, आणि तू पण! प्रचंड थंडी, त्यात तू स्वत:ला आकडून माझ्यासमोर हसत उभी, केस थोडेसे विस्कटलेले, पण तुझं ते अगदीच नजर खिळवून ठेवणारं नैसर्गिक सौंदर्य, मला माझ्या मनावरचा ताबा तोडण्यास मजबूर करत असल्यासारखं जाणवलं. का कुणास ठावूक, पण इतक्या सकाळी तुझ्या ओठांवर किस देण्याचा मोह मला झाला. पण मन मारून कंट्रोल केलं स्वत:ला!
आता एवढ्या सकाळी काय बोलणार तुझ्याशी? मग शेजारच्या टपरीवर वाफाळलेला चहा तुझ्याकड पाहत ३ वेळेस पोटात रिचवला. दोघांची पण प्रेमात पडण्याची पहिलीच वेळ असल्यानं आता नेमकं काय करतात या कुचम्बनेत आपण दोघेही सापडलो. उगाच अरसिक विषयावर तुटक तुटक बोलू लागलो.
“चल आपण थोडसं फिरून येऊया?” तू.
साला हे मला का सुचलं नाही विचारायचं?
ब्याग त्या चहाच्या टपरीवर ठेवून, निर्मनुष्य रस्त्यावर दाट धुक्यात आपण दोघे चालू लागलो. का कुणास ठावूक, पण मैत्रीची रेषा ओलांडल्या नंतर आणि नवीन नात्यात पदार्पण करताना कुठेतरी थोडी संकोचाची दरी निर्माण झाल्यासारखं वाटलं! तुझ्या खांद्यावर टाकण्यासाठी उचललेला हात ३ वेळेस तसाच खाली घेतला. खूप चाललो ना आपण त्यादिवशी? चालता-बोलता अर्धा तास धुक्यात फिरल्यावर नवीन नात्यातील ती दरी अचानक कुठेतरी गायब झाल्यासारखं आणि मैत्रीतील ती खोडकर प्रवृत्ती अजूनही पूर्णपणे जिवंत असल्याची प्रचीती आली.
नंतर आपल्या कित्येक भेटी झाल्या, किती फिरलो, खूप सार्या आठवणी जमा केल्या, प्रेमात अक्षरश: बुडून गेलो, भांडण, रुसवा, फुगवा, सारं काही करून आजही आपली मैत्री आणि प्रेम उत्तरोत्तर वाढतच आहे. अजूनही मी तितक्याच ओढीने तो हजारो मैलांचा प्रवास करतोय, आणि तुही तितक्याच ओढीनं सकाळी डोळे चोळत मला भेटायला येतेस! प्रत्येक सकाळी मला तू पूर्वीपेक्षा सुंदर भासतेस, आणि तुझ्या त्या स्माईल वर तुझा एक किस घेण्याची अजूनही माझी तितकीच प्रबळ इच्छा होते.
कसल्याही टेन्शन मधून अगदी दहा मिनिटात तुझ्याशी बोलून मी बाहेर निघतो, माझा ऑफिस मधला स्ट्रेस तुझं निखळ हास्य ऐकून कमी होतो, तुझ्या मिठीत मी सारं जग विसरून जातो! तुझ्या मिठीतच आयुष्य संपून जावं असंही मला कित्येकदा वाटत! खरच जर तसं काही झालं तर माझ्यासारखा सुखी दुसरा कोणी नसेल! (मला माहितीय हे वाचून तू मला मनात दहा-बारा शिव्या दिल्या असशील आता, असो.)
हे सगळं असंच चालत राहावं असं मनोमन वाटत राहतं नेहमी. आपलं पुढे लग्न होईल, नाही, काही माहिती नाही, पण जो वर्तमान आपण जगतोय तो खरच खूप छान आहे. भविष्यातही हा वर्तमान असाच राहावा!
शेवटी, काळत-नकळत माझ्याकडून बर्याच वेळा तुला हर्ट झालं असेल, पण त्यामागे केवळ तुझ्यावर असलेलं प्रेम आणि तुझी वाटणारी काळजी हेच कारण होते, आहे आणि असेल. माझ्यावर असच निरंतर प्रेम करत राहा. अगदी माझ्या पेक्षाही जास्त!
या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण का कुणास ठावूक, तुला त्या सांगण्याची इच्छा झाली, आणि म्हणून हा सगळा लिहिण्याचा प्रपंच-पसारा!
भेटू आता गुरुवारी सकाळी. त्याच ठिकाणी, नेहमीसारख!