क्षुद्र! होय क्षुद्र आहोत आपण, या विशाल निसर्गाच्या समोर!
पण मनात उठणारी वादळे हि निसर्गात उठणाऱ्या वादळापेक्षा कितीतरी भयंकर वाटतात कधी कधी.
जसे पाला-पाचोळा एखाद्या वावटळीत उडून हेलकावे खात सैरभैर उंचच उंच उडून जातो, अगदी दिसेनासा होतो, क्षुद्र भासतो, तसेच एखाद्या वादळात आपले मन पण भरकटून जाते, एका अनामिक विश्वात भिरभिरत राहते, आणि नंतर त्याला त्याचा स्वत:चाच ठिकाणा सापडत नाही. सागरात उठणाऱ्या असंख्य प्रलयकारी लाटांसारख्या असह्य वेदना उठत राहतात मनात, उन्माद धारण केलेल्या एखाद्या वनाग्नी सारखे जळत राहते आपले मन आतल्या आत, अन ती आग विझवणे त्या वेळी कुणाच्याच हातात नसते, अगदी आपल्या स्वत:च्या देखील! का उठतात अशी भावनिक वादळे, का भरकटते आपले मन?
एखादा मोठा भूकंप होऊन धरणी फाटावी तसे आपले मन फाटून जाते! समजुतीची ठिगळे लावताना लक्षात येते कि, सारे आभाळच फाटले आहे तर कुठे कुठे ठिगळे लावून जोडणार?
चार भिंतींमध्ये स्वत:ला कोंडून घेऊन मनसोक्त रडण्याची इच्छा होते...मग स्वत:ची कीव देखील येते, काय कमावले आपण? डोके ठेऊन मनसोक्त रडण्यासाठी एखादा खांदा सुद्धा आपल्याला मिळत नाही?
काय हवे असते अशा वेळी या मनाला? आधार? सहानुभूती? प्रेम? कि अजून काही?
किती प्रश्न...सारे निरुत्तरित!
No comments:
Post a Comment