भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपण इतिहास आणि भूगोलात अगदी चौथी-पाचवी पासून वाचत आलो आहोत. भारतीय शेतकरी जगातील सर्वात जास्त पिके घेतो, शिवाय भारतीय जमीन हे पेराल तेथे सोने उगवणारी जमीन आहे असे देखील म्हणतात. पण हे सर्व पुस्तकात वाचण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. खरी परिस्थिती खूप वेगळी आहे.
भारतात हजारो वर्षापासून घेतल्या जाणार्या पिकांमध्ये ऊस हे एक महत्वाचे पीक आहे. असे असले तरी ऊस हे भारतीय शेतीकर्याचे प्रमुख पीक कधीच नव्हते. मग असे काय घडले कि आज ऊस हे पीक भारतीय शेतीचा अविभाज्य घटक बनले?
आपण या ठिकाणी माझ्या एका गावाचा विचार करूया, त्यावरून मग आपणास पूर्ण भारतातील किंवा कमीत कमी महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज येयील.
१९७१-७२ साली माझ्या ४ हजार लोकसंख्येच्या गावात फक्त ४ शेतकर्याकडे विहिरी होत्या, त्यातील तिघांकडे सिंचनासाठी मोट वापरली जायची आणि एका शेतकर्याकडे (आमच्याकडे) क्रूड ओईल वर चालणारे इंजिन होते. तर हे चार शेतकरी फक्त पाण्याची शेती करत आणि यांच्याकडे एकूण १५-२० एकर ऊस होता. इतर क्षेत्र निव्वळ ज्वारी, हरभरा, तूर, गहू अशा रब्बी पिकाखाली असायचे. खरीप हंगामात सहसा पिक घेत नसत.
त्याकाळात ऊस हा फक्त गुळ बनवण्यासाठी वापरला जायचा, साखर नावाचा प्रकार अद्याप या भागात अस्तित्वात आलेला नव्हता. दरम्यान या भागात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली, तत्कालीन सुशिक्षित पुढार्यांनी शेतकर्यांना सहकाराचे महत्व पटवून दिले, शेअर्स जमा केले, शेतकर्यांना ऊस लावण्यास प्रोत्साहित केले, शिवाय इतर पिकांपेक्षा उसाला चांगला भाव देऊ केला, आपसूक गावातील विहिरी वाढल्या, मोट वाढल्या, इंजिन वाढले. १९८५ साली गावात पहिले बोर पाडले गेले. १९९० पर्यंत गावात २०० बोर पाडले गेले. ऊस क्षेत्र ५०० एकर पर्यंत गेले. ऊस या नगदी पिकामुळे शेतकर्यांना बर्यापैकी उत्पन्न मिळू लागले, आणि आपसूक परिसरातील सर्व शेतकरी ऊस लागवडीसाठी धजू लागले.
२००० सालापर्यंत परिसरात १० साखर कारखाने उभे राहिले, कारखान्यात स्पर्धा लागली, शेतकर्यात स्पर्धा लागली. एकट्या गावाचे उस क्षेत्र ५००० एकरच्या वर गेले. गावात २००० पेक्षा जास्त बोर पाडले गेले. पाणी पातळी १०० फुटावरून ६००-७०० फुटावर गेली. ऊसामुळे इतर खरीप रब्बी पिके मागे पडली. रोजगाराचे भाव वाढले. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रमाणाबाहेर पाणी आणि रासायनिक खते वापरण्यात येऊ लागली. सलग १०-१० वर्षे एकाच जमिनीत उस घेण्यात येऊ लागला. जमिनीचा कस खालावला. सुरुवातीस एकरी ६०-७० टन निघणारा उस २००५ पर्यंत ३५-४० टन निघू लागला. शिवाय सहकारात राजकारण सक्रीय झाले, भ्रष्टाचार सुरु झाला, संचालक आणि कार्यकारी मंडळीनी आपले खिसे भरून घेतले. उसाचे भाव स्थिर झाले, कारखाने डबघाईला येऊ लागले.१९९०-२००५ या काळात खासगी कारखान्यांचा जन्म झाला. पुन्हा भाव देण्यासाठी स्पर्धा, शेतकऱ्यांची स्पर्धा. यामुळे महाराष्ट्रातील फळबाग क्षेत्र झपाट्याने कमी झाले. द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्री, चिकू घेणारे बहुतांश शेतकरी उसाकडे वळले. कांदा, मिरची आणि इतर भाजीपाला घेणारे शेतकरी देखील उसाकडे वळले. मराठवाड्यातून ज्वारी, हरभरा आणि गहू हि पिके संपुष्टात आल्यात जमा झाली.
२०११ सालापर्यंत परिसरात १६ साखर कारखाने उभे आहेत. गावात ५००० च्या आसपास बोर पाडले आहेत. पाणी पातळी ९०० ते १००० फुटावर गेली आहे. दर वर्षी किमान ३००-४०० बोर नवीन पडत आहेत. पैकी ५०-६० बोर ला पाणी लागते आणि इतर सारे फेल जात आहेत. भू-गर्भाची अक्षरश: चाळणी झाली आहे. अगदी २०-२५ फुटावर ३-४ बोर झाले आहेत. पर्जन्य कमी झाले आहे, उस उतारा आता केवळ २०-२५ टन प्रती एकर झाली आहे. खताच्या किमती गगनास भिडल्या आहेत. रोजगार देखील खूप वाढला आहे. उस पिक तोट्यात येऊ लागले आहे.
२०१२ म्हणजेच चालू वर्षी पर्जन्य खूपच कमी झालं आहे, आणि उस या पिकावर अवलंबून न राहता मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन या खरीप पिकाकडे, आणि हरभरा व कांदा या रब्बी पिकाकडे वळला आहे. किंबहुना सोयाबीन हे पिक यावर्षी उसापेक्षा फायदेशीर ठरले आहे. आणि २०१३ या साली उस क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत केवळ २० टक्के इतकेच राहील कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. डाळिंब, चिकू आणि मोसंबी फळबाग क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. आणि या परिस्थितीचा अंदाज आल्याने पुन्हा खासगी साखर कारखान्यात भाव देण्यावरून कमालीची स्पर्धा लागली आहे.
हे चित्र आहे फक्त माझ्या एका गावाचे. आणि हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ऊस या नगदी पिकामागे धावताना महाराष्ट्रातील “काळी कसदार मृदा”(Black Cotton Soil) हि गोष्ट आता नामशेष झाली आहे. अमाप रासायनिक खते आणि औषधांच्या वापरामुळे जमिनीचा पोत, कस, दर्जा, आणेवारी अगदी निकृष्ट झाली आहे. पाण्याची सरासरी पातळी ६००-७०० फुट इतकी खालावली आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी हि मूळ मराठी पिके काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आणि शेवटी एवढ सगळं होऊनही शेतकरी मात्र जिथल्या-तिथंच आहे, आणि यामुळे मनात तीव्र असंतोष निर्माण झाल्याने आज तो रस्त्यावर उतरला आहे, आणि सरकारी बंदुकीचा शिकार झाला आहे. अजून दहा वर्षांनी महाराष्ट्रातील शेतीचे काय आणि कसे चित्र असेल देवच जाणो!
झालेल्या प्रकारात सरकारी धोरणांची आणि सहकारी-खासगी कारखान्यांची जेवढी चूक आहे तेवढीच चूक शेतकर्याची देखील आहे!
Mahesh Haul Patil, बंगळुरु.
अभ्यासपुर्ण . ऊस तसेच केळी पिकाची परिस्थीतीत तशीच जळगाव जिल्हात आहे पाण्यासाठी खुप खोल बोर घेण्यात आले असुन पाण्याची पातळी दरवर्षी खाली जात आहे . पाण्याच्य ऊपलब्ध नुसार पिक घेणे आवश्यक झाले आहे या साठी प्रबोधन आवश्क झाले आहे
ReplyDeleteअभ्यासपुर्ण . ऊस तसेच केळी पिकाची परिस्थीतीत तशीच जळगाव जिल्हात आहे पाण्यासाठी खुप खोल बोर घेण्यात आले असुन पाण्याची पातळी दरवर्षी खाली जात आहे . पाण्याच्य ऊपलब्ध नुसार पिक घेणे आवश्यक झाले आहे या साठी प्रबोधन आवश्क झाले आहे
ReplyDelete