Mann Maze

Mann Maze

शेती व्यवसाय

माझ्या वडिलांनी सन १९७७ साली MSc Agri (MPKV Rahuri) पदवी मिळवली, आणि कित्येक संधी अक्ख्या महाराष्ट्रात उपलब्ध असताना देखील स्वत:ची शेती करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. अगदी घरच्या लोकांपासून ते गावातल्या प्रत्येकाने त्यांना वेड्यात काढले, कारण त्या काळात आमच्या पंचक्रोशीत एवढे शिकलेला एकमेव माणूस एवढे शिकून पुन्हा शेतीत कशाला परत येतोय हे कुणाला कळाले नाही. वडील त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. वेगवेगळे प्रयोग करून, नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेती फुलवली. दरवर्षी विविध पिके घेतली. भरघोस उत्पन्न काढून दाखविले. शिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शरद जोशींसोबत अख्या महारष्ट्रात शेतकरी संघटनेचे बरीच वर्षे नेतृत्व देखील केले.
पण शेवटी शेवटी सरकारी धोरणे, निसर्गाने सोडलेली साथ, वाढलेले रोजगार भाव यांच्यामुळे एवढी चांगली शेती तोट्यात येऊ लागली.
दरम्यान मी स्व-इच्छेने मराठवाडा कृषी-विद्यापीठात कृषी-अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि वडिलांना "माझा तांत्रिक शेती करण्याचा मानस" कळविला. कारण MMBS करून मुले स्वत:चा दवाखाना सुरु करतात, BE करून छोटी-मोठी फ्याक्टरी टाकतात, MBA करून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावतात, मग Agriculture course करून मुले शेती का करत नाहीत? हा प्रश्न मला सतावत राहायचा.
वडिलांनी सर्व परिस्थितीचा विचार करून स्पष्ट शब्दात "नाही" म्हणून सांगितले. कसली का असेना पण मी नौकरीच करावी असे त्यांचे मत होते. आणि त्यात त्यांच्या दृष्टीने चूक काहीच नव्हते. कारण शेतीची ढासळत चाललेली अवस्था त्यांना, मला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होती. आणि त्यात एवढे शिकून मी पुन्हा शेतीत येणे म्हणजे स्वत:च्या हाताने स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतण्यासारखे होते. शिवाय त्यांनी हे सर्व स्वत: अनुभले असल्यामुळेच तर ते एवढ्या ठामपणे नको म्हणून सांगत असावेत.
सारासार विचार करून मग मी काही दिवस एका मायक्रो इरिगेशन कंपनीसाठी काम केले, नंतर उच्च शिक्षणासाठी बंगलोरला आलो. आणि M.Tech. करून पुन्हा नौकरीच करतोय. पण शेती करू शकलो नाही याची खंत अजूनही माझ्या आत कुठेतरी सलत राहतेय.

आणि आज जेव्हा मी गावी जातो, तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचा हाच विचार झालेला दिसतोय, कि त्याच्या मुलाने शेती करू नये. आदळत आपटत शिकून, शिपायाची का मिळेना, पण नौकरीच करावी. पुढील २५ वर्षानंतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भयानक कमी होईल यात शंका नाही.


खरच शेती व्यवसाय करणे एवढे लाजिरवाणे आणि कनिष्ठ दर्जाचे झाले आहे का?

No comments:

Post a Comment