Mann Maze

Mann Maze

गारपीट

आणि अशाप्रकारे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीला सुरुवात होत आहे. गहू, ज्वारी, कांदा वगैरे हाताशी आलेली पिके आडवी होतील, द्राक्ष, केळी, डाळींब वगैरे फळबागांची झाडाझडती होईल!! विजा पडतील, ढोरं - माणसं होरपळून मरतील!

मीडियावाल्याना आता दुष्काळात देखील TRP मिळवण्यासाठी मसाला मिळेल, आणि शहरी शिक्षित जनतेला देखील त्याच त्या JNU च्या आणि रोहितच्या बातम्यांतून तोंड बाहेर काढून शेतकऱ्यांसाठी 2-4 दिवस फेसबुकवर बरळण्यासाठी नवीन विषय मिळेल! दुष्काळात काम नसलेल्या खेड्यापाड्यातल्या माझ्यासारख्या तरुणांना गारपीटीचे फोटो काढुन WhatsApp वर फिरवायला मिळतील!!


सरकारला पण तेवढंच एखादं नवीन प्याकेज जाहीर करण्याची संधी मिळेल, मंत्री लोकांना हेलिकॉप्टर मधून बसून उगाच पाहणी करता येईल, कलेक्टर - तहसीलदार लोकांना आदेश देण्यात येतील, तलाठी लोकांना भर उन्हाळ्यात बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या नोटिसा येतील, कागदोपत्री सगळं काही पार पडेल, चार महिने असेच निघून जातील.

हाती येईल फक्त शून्य!!!

सरकार कुठलं का असेना, भेंचोद सगळा उपक्रम तोंडपाठ झालाय!!

दूरदृष्टी


इंग्रजांनी दूरदृष्टी ठेवून भारतात पुष्कळ इमारती बांधल्या, रस्ते तयार केले, रेल्वे सुरु केली, पूल बांधले आणि अजून बरच काही केलं आणि आपण आजतागायत ते सर्व वापरत आहोत! इंग्रजांनी भारतातील पाण्याचं थोडंफार नियोजन देखील करून ठेवलं असतं त्याकाळात तर आता सरकारच्या नावानं जास्त बोंबलत बसावं लागलं नसतं!!

शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अगोदरच्या सर्वच राजांनी प्रत्येक किल्ल्यावर सर्वात आधी पाण्याची सोय केली आणि नंतर किल्ला बांधला, हल्लीचे राज्यकर्ते आपली दूरदृष्टी कुठे गहाण ठेऊन जन्माला आलेत कुणास ठाऊक?

भगदाड

कामांध नजरेला
वासनेचा वास येथे..
बरबटलेल्या वासनेला
नग्णतेची  साथ येथे...

धर्माच्या जोडीला
वेगळीच एक जात येथे..
जातीच्या राजकारणात...
कुणाचा हात येथे?

स्वत:च्या फायद्यासाठी...
डोळ्यांत फेकती धूळ येथे...
धुळीच्या धूसर दृष्टीत
भ्रष्टचाराचे खोल मूळ येथे.

दोन वेळचे खायला
जनता मोताट येथे...
मड्याच्या टाळूचे लोणी खाया..
कुत्रे किती मोकाट येथे...

कायदे झाले सैल..
गुंडगिरी मात्र सक्त येथे..
अन गल्लीबोळातून हल्ली..
वाहते सैराट किती रक्त येथे..

बुवाबाजीच्या नावाखाली
राजरोज चाले सट्टा येथे..
आंधळ्या भक्तांची आंधळी श्रद्धा..
अन देवाच्या नावाला बट्टा येथे...

करुनी सहन इतके...
तरीही मन मुर्दाड येथे...
पांडुरंगा, धाव आता...
पडले मोठे भगदाड येथे...
महेश.

दुष्काळ

पाय अनवाणी, पावले झपाझप
पोट खापाडीला, कष्ट वारेमाप!

हातात इकण, वार धरणीच्या पोटी
फुटतो दगड, कवा लागल पाझर?

भयान उन, लाही लाही जीव
अंगार झळया, कोण करीतं कीव!

उटली वावटळ, उडाला पाचूळा
घामेजल्या कमरत, ढसला पिसुळा!

उडाली पाटी, बाळ उघडा गोजिरा
खाट धरणीची, वर आसमंत सारा!

तान्हुला जीव, फोडी कर्कस बरडा
माय धावुनी येई, घेई मुका कोरडा!
रखरख उन्हामंदी तिचा आटला पान्हा...
फाटक्या पदराखाली जीव रडतो तान्हा!

गरीबाच्या जीवाला, भोग किती पच्चास!
कवा फिटल हे पाप, काय देवाजीच्या मनात?

महेश.