Mann Maze

Mann Maze

पाऊस आणि चॅनेलवाले

मागच्या काही दिवसापासून  काही मराठी न्यूज चॅनेलवाल्यांनी  त्यांचा दिमाग काय कुठं गहाण ठेवलाय का काय असा प्रश्न वारंवार पडू लागला आहे?
एखाद्या गावात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चांगला पाऊस पडला तर लगेच अक्ख्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला म्हणून बातमी देतायत!
माझ्या गावात आणि तालुक्यातही अजून एकदाही चांगला पाऊस पडलेला नाही, पण शेजारच्या एक तालुक्यात एक चांगला पाऊस झालेला आहे. तरीही हे चॅनेलवाले "उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस, पूर परिस्थिती" वगैरे बातम्या देत आहेत! अगदी अशाच बातम्या लातूर जिल्ह्यासाठी देखील ते देत आहेत. गाव, तालुका, जिल्हा यातला काही फरक कळतो की नाही या वार्ताहरांना?

पेरणी करण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो, किंवा पेरणी झाल्यापासून पीक हाताशी येईपर्यंत किती पाऊस पडावा लागतो, विहिरीला/ बोरला  पाणी येण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो यातलं कसलंही ज्ञान नसताना पावसावरच्या बातम्या देण्यासाठी अशा अक्कलशून्य वार्ताहरांना हे च्यानेलवाले कशासाठी पाठवत असतील?

एकाच पावसात गावचा पाणी प्रश्न मिटला वगैरे भंकस बातम्या जेव्हा हे देतात तेव्हा त्यांच्या मुस्काटात हाणावीशी वाटते, एक पावसात पडलेलं पाणी एकदा त्यांना पाजायला पाहिजे, मग कळेल पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो आणि पाऊस पडल्यानंतर ते पिण्या योग्य होण्यासाठी किती वेळ लागतो!!

ग्रामीण भागातील बातम्या देण्यासाठी त्या पत्रकाराची नाळ त्या ग्रामीण भागाशी जुळलेली असायला हवी, पांढरपेशी पत्रकारांचे हे काम नव्हे!

(हे माझा वयक्तिक मत आहे.)

तू, मी आणि पाऊस!

मला जितकी तुझी तितक्याच तिव्रतेने पावसाची आठवण येतेय. मी आसुसलोय तुला पावसात चिंब भिजलेली पहायला, पावसाचे थेंब तुझ्या गालावरून ओघळताना टिपून घ्यायला. वाऱ्याने गारठणारं तुझं शरीर अलगद माझ्या मिठीत शिरून शांत होताना मला पहायचयं. थरथणारे तुझे ओठ माझ्या ओठानी व्यापून टाकायचेत मला! लाजेने आरक्त झालेले तुझे गाल आणि वाफाळणारे तुझे श्वास मला मझ्यात सामावून घ्यायचेत. मला सामावून घेणारे, आणि एका क्षणात सर्व जगाचा विसर पाडायला लावणारे तुझे डोळे पहायला मी आसुसलोय.
आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींनी मला अक्ष्ररशः वेड लावलंय त्यापैकी एक तू आणि दुसरा पाऊस! तुम्हा दोघांचीही उणिव मला मरेपर्यंत सतावत राहील. एकवेळ पावसाचं मी समजून घेउ शकतो पण तुझ्याशिवाय.......

पहिल्या प्रेमातला पहिलाच पाउस, मी कधीही विसरू शकत नाही ते क्षण! आणि आठवतं तुला? अशाच एका वर्षासंध्येला आपण समुद्रावर उभे होतो. पाउस नुकताच पडून गेलेला तरीही त्याची रिमझिम सुरुच होती. तु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उधाणलेल्या समुद्राला बघण्यात मग्न आणि मी तुझी शांत चर्या न्याहळण्यात मग्न. माझा हात तुझ्या कमरेला वेढा घालून तुझ्या हातात असलेला. प्रत्येक लाटेबरोबर तू तो अजुनच घट्ट धरलेला. गार वाऱ्याची झुळुक तुझ्या मानेवरच्या केसांना माझ्या चेहऱ्यावर आणून अलगद सोडते. मी तुझ्या स्पर्शाने बेधुंद झालेला. हळूहळू काळोख पडू लागतो पण पाय जागेवरून हालत नाहीत. अचानक! एक गार वाऱ्याचा झोत वेगाने अंगावर येतो, तो तुला सहन नाही होत तु लगेचच मला बिलगतेस आणि थरथरणारे तुझे ओठ माझ्या ओठंवर ठेवतेस २, ३.. ४ किंवा ५ सेकंद!!!!! पण तो क्षण कधी संपू नये असं वाटत राहतं! तुझी मिठी, तुझा स्पर्श, तुझा सुगंध माझ्या रोमरोमांत अगदी एखाद्या जालीम विषासारखा भिनत जातो आणि मी त्या विषाने मंत्रमुग्ध होउन तुझ्या मिठीत जगू लागतो.

प्रेमाचे हे सारे क्षण मला आजही वेड लावतात. तु नसतानाही तु असल्याचे भास होतात. तु गेल्यापासून प्रत्येक पाउस मी असाच तुझ्या आठवणींनी भिजतो. एकदा ना मला ह्या पावसांच्या सरींच्या प्रवाहात वाहून जायचयं कुठल्यातरी वळणांवर तु भेटशील या आशेवर!

M..

गारपीट

आणि अशाप्रकारे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीला सुरुवात होत आहे. गहू, ज्वारी, कांदा  वगैरे हाताशी आलेली पिके आडवी होतील, द्राक्ष, केळी, डाळींब वगैरे फळबागांची झाडाझडती होईल!! विजा पडतील, ढोरं - माणसं होरपळून मरतील!

मीडियावाल्याना आता दुष्काळात देखील TRP मिळवण्यासाठी मसाला मिळेल, आणि शहरी शिक्षित जनतेला देखील त्याच त्या JNU च्या आणि रोहितच्या बातम्यांतून तोंड बाहेर काढून शेतकऱ्यांसाठी 2-4 दिवस फेसबुकवर बरळण्यासाठी नवीन विषय मिळेल! दुष्काळात काम नसलेल्या खेड्यापाड्यातल्या माझ्यासारख्या तरुणांना गारपीटीचे फोटो काढुन WhatsApp वर फिरवायला मिळतील!!

सरकारला पण तेवढंच एखादं नवीन प्याकेज जाहीर करण्याची संधी मिळेल, मंत्री लोकांना हेलिकॉप्टर मधून बसून उगाच पाहणी करता येईल, कलेक्टर - तहसीलदार लोकांना आदेश देण्यात येतील, तलाठी लोकांना भर उन्हाळ्यात बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या नोटिसा येतील, कागदोपत्री सगळं काही पार पडेल, चार महिने असेच निघून जातील.

हाती येईल फक्त शून्य!!!

सरकार कुठलं का असेना, भेंचोद सगळा उपक्रम तोंडपाठ झालाय!!

दूरदृष्टी

इंग्रजांनी दूरदृष्टी ठेवून भारतात पुष्कळ इमारती बांधल्या, रस्ते तयार केले, रेल्वे सुरु केली, पूल बांधले आणि अजून बरच काही केलं आणि आपण आजतागायत ते सर्व वापरत आहोत! इंग्रजांनी भारतातील पाण्याचं थोडंफार नियोजन देखील करून ठेवलं असतं त्याकाळात तर आता सरकारच्या नावानं जास्त बोंबलत बसावं लागलं नसतं!!

शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अगोदरच्या सर्वच राजांनी प्रत्येक किल्ल्यावर सर्वात आधी पाण्याची सोय केली आणि नंतर किल्ला बांधला, हल्लीचे राज्यकर्ते आपली दूरदृष्टी कुठे गहाण ठेऊन जन्माला आलेत कुणास ठाऊक?

श्री विश्वनाथ मंदिर

साताऱ्याजवळ दोन नद्यांच्या संगमावर असलेलं हे रमणीय पेशवेकालीन श्री विश्वनाथ मंदिर. संगमाच्या तिन्ही बाजूला तीन अतिशय सुंदर प्राचीन शिव मंदिरे आहेत.
बऱ्याच हिंदी- मराठी चित्रपटांचं चित्रीकरण या मंदिराच्या परिसरात झालं आहे.
याच मंदिराच्या समोर नदीच्या पात्रात राणी ताराबाईची समाधी आहे.

मन सैरभैर...

सतरंजीवर उताना पडून  छपराला अडकवलेल्या पंख्याकडं डोळे सताड उघडे ठेउन केव्हाचा  एकटक बघतोय! फिरणाऱ्या पंख्यासोबत तितक्याच वेगाने तुझ्या आठवणी मनात पिंगा घालत आहेत! रात्र सरत जातेय अणि झोप काही येता येत नाही!
आपल्या दोघांच्या कुठल्यातरी एखाद्या अविस्मरनीय आठवणीवर येउन हा फिरणारा पंखा काही वेळ थाम्बावा, रात्रही तेथेच थाम्बावी आणि अचानक भूकंप यावा व इतके दिवस पंख्याला आधार देणारे ते छप्पर कोसळून जावे आणि या न संपणाऱ्या रात्रीची पुन्हा कधी सकाळच होऊ नये!

मन सैरभैर.....

महेश.

पळसदेव मंदिर

उजनी धरणाची पाणी पातळी मृत साठ्याच्याही खाली गेल्यामुळे धरणाच्या पाण्यात बुडालेले पळसदेव मंदिर कित्येक वर्षानंतर यावर्षी पूर्णपणे उघडे झाले आहे!
या मंदिराशी अगदी मिळतं जुळतं हुबेहूब हेमाडपंती मंदिर माझ्या गावात (श्री महालक्ष्मी मंदिर, जागजी, ता. उस्मानाबाद) आहे! शिखरावरचं नक्षीकाम मंदिराचा गाभारा अगदी हुबेहूब आहे!
आमच्या गावातील मंदिरासमोर मोठी पुष्कर्णी (बारव) आहे, ती या मंदिरासमोर नाही! आणि या मंदिराला जी बाजूने भिंत आहे ती आमच्या मंदिराला नाही.
इतकी वर्ष पाण्यात बुडून देखील मंदिराचा पाया अजूनही खचला नाही हे नवलच!!


पीकविमा

मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या खरीप पिकासाठी (सोयाबीन, तूर, भुईमूग इ.) यावर्षी ऐन दुष्काळात पेरणीच्या तोंडावर चांगला पीकविमा मंजूर झाला आहे आणि येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर बहुतेक जमा देखील होईल! तरीही अजून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने याचं श्रेय लाटल्याचं दिसून येत नाहीये याचंच अजून आश्चर्य वाटतंय!!
पूर्वी असा पिकविमा आला कि शेतकरीदेखील त्याचं श्रेय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे किंवा पदमसिंह पाटलांना द्यायचे, पण यावर्षी शेतकरी देखील याचं श्रेय कुणालाच देताना दिसत नाहीयेत याचंही तेवढंच आश्चर्य वाटतय!!
असो, शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला हे महत्वाचं!

सद्यस्थितीला अनुसरून

⁠⁠⁠१.
कुत्र्याचा मूत जसं वघळ धरून रस्त्याच्या कडंला जातंय तसं कुसळधार पाऊस पडायलाय, अन चायनेलवाले त्याला बी मुसळधार पाऊस म्हणून दाखवायलेत अन हवामान खत्यावाले शेतकऱ्यास्नी पेरण्या करा म्हून संगायलेत! शेतकऱ्याला हे समदे चायनेलवाले अन हवामानवाले च्युत्याच समजत्यात का काय?
२.
यंदा कोणतंच चायनेल वारीचं कव्हरेज घ्यायलेलं दिसनां झालंय!
अन पावसाच्या आशेनं गावातूनबी यावर्षी वारीला जाण्यात कुणाला लय इंटरेस्ट दिसनां झालाय! देव पावतंय वाटालंय यंदा!!
३.
मराठवाड्यातला पाणीसाठा निव्वळ १% च शिल्लक राह्यला म्हणून चायनेलवाले बम्बलूलालेत, तरीबी वरून दुष्काळ प्याकेज काय यीना झालंय! बंद पडायलेल्या कारखान्याला तर लगेच प्याकेज यायलंय!
४.
तिकडं रघुरामनं राजीनामा दिल्यानं आता देशाची अर्थव्यवस्था बुडल का काय असंच सगळ्या चायनेल वाल्याना अन शिकलेल्या लोकास्नी वाटायला लागलंय! शेतकरी बिचारा यंदा म्हसरं जगतेल का मरतेल म्हून येणाऱ्या जाणाऱ्या वांझोट्या ढगाकडं टक लावून बघत बसलाय!
५.
लातूर उस्मानाबाद बीड वाल्या शेतकऱ्यास्नी मागच्या खरीपाचा पीक विमा मिळालाय खरा पण अजून अकौंटात काय जमा नाय झाला! त्याच्याच जोरावर यंदा खत बी उधार आणून ढाळजंत टाकलंय! तिफण, कासरा, रासनी, वटा समदं तयार करून ठिवलंय खरं वल काय चार बोटाच्या खाली जाईना झालीय अजून!

महेश हाऊळ
२० जून २०१६

अनुत्तरीत प्रश्न!

⁠⁠⁠पावसाळ्याच्या पहिल्या वहिल्या रात्री, जेव्हा वर्षभर आसुसलेल्या त्या धरतीवर मेघराज खूष होऊन गडगडाट आणि विजा सोबतीला घेऊन जेव्हा बरसू लागतो तेव्हा अचानक एखादं कारण मनातल्या मनातच काढून धरतीने न सांगता त्या मेघराजावर रुसावं आणि मेघराजही आपलं काय चुकलं ह्या विचारात मग्न होऊन ते मिलन अधुरंच राहावं, ती रंगात आलेली प्रणयक्रीडा थांबावी  या पेक्षा वाईट दुसरं काय होऊ शकतं? एका क्षणात वातावरणातील तो गारवा, तो मृदगंध, तो गडगडाट आणि ती ऊर्जा नष्ट होऊन अचानक कैफल्य आणि नाराजीचा कोंदट वास सर्वत्र पसरतो, मनं कोमेजली जातात, विचारांचं थैमान सुरु होतं, कडूगोड आठवणींची इतिहास जमा झालेली स्मृतीपृष्ठे डोळ्या समोरून सरसर पालटली जातात!
त्यातल्याच एखाद्या काळाच्या ओघात निसटलेल्या आठवणीसोबत डोळ्यातून एखादा मोती निखळून उशीमधल्या मऊ कापसात त्या काळासारखाच जिरून जातो!
मध्यरात्र उलटून जाते, पहाटेची आस लागते, तरी डोळ्यांना झोपेचा सूर सापडत नाही, विचारांच्या लाटांना किनारा गवसत नाही!
हळूहळू रात्र सरत जाते, घड्याळाचे काटे निमूटपणे आकड्यांच्या भोवती फिरत वातावरणातील शांततेला भंग करत राहतात!
एव्हाना गरजणारे ढग आणि त्यातली ऊर्जाही नष्ट झालेली असते आणि सरत जाणाऱ्या रात्रीच्या मिठीत ती धरणीही निद्रिस्त झालेली असते!
हवेत उरलेली असते फक्त विरक्ती आणि डोळ्यांना लागलेली असते ओढ त्या जवळ येणाऱ्या पहाटेची!
विचारांचं थैमान थांबण्यासाठी ही रात्र सरून पहाट होणं फार गरजेचं होऊन बसतं!
अशा कित्येक रात्री कित्येकांच्या आयुष्यात कित्येक वेगवेगळ्या स्टोऱ्या पहाटेच्या हवाली करून  गुडूप झाल्या असतील, त्यातल्या कित्येक स्टोऱ्या शब्दांच्या कैदेत न अडकता या वातावरणातील प्रदूषित हवेत विरून गेल्या असतील आणि डोळ्यातून निसटलेले कित्येक खारट मोती त्या उशीने पिऊन टाकले असतील!
असे कित्येक पावसाळे येतीलही आणि जातीलही, मागे वळून पाहताना, थोडं बरसायचं राहूनच गेलंय याची खंत त्या मेघराजाला वाटत राहील का? आणि भरून आलेल्या ढगाखाली थोडं भिजायचं राहूनच गेलंय याची खंत त्या धरणीला वाटत राहील का?

अनुत्तरीत प्रश्न!!