दिवस मावळतीला झुकतो...मी एक पेन आणि कागद घेऊन काहीतरी लिहिण्यासाठी म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावर जातो. वाळूमध्ये पाय रोवून त्या अथांग सागराकडे पाहतो. हजारो मैलांचा प्रवास करुण आलेल्या त्या लाटांना माझ्या पायाशी येऊन संपताना पाहतो...मग उद्विग्न होऊन चालत राहतो किनाऱ्यावर...कित्येक लाटा येतात, जातात. मग विचार येतो, ज्या लाटा किनाऱ्याच्या भेटीसाठी एवढा दूरचा प्रवास करुण येतात, ज्या ओढीने येतात, त्यांची भेट फक्त काही क्षणांची?
पुन्हा किती काळ त्या लहरींना किनाऱ्याच्या शोधात भटकावे लागेल? किती अंतर चालावे लागेल? किती वादळांचा सामना करावा लागेल?
कसलं हे प्रेम? कसली हि आसक्ती? कसली हि ओढ मिलनाची?
किती हा संयम?
आणि मी, तू मागच्या काही दिवसात भेटली नाहीस तर पुरता ढासळून गेलोय...एवढाहि संयम माझ्याकडे नसावा?
कसा असेल संयम, तू ओढच तशी लावलीस नां....
शब्द कागदावर उतरवण्या पूर्वीच सूर्य बुडतो...अंधार होतो...आणि मी काहीही न लिहिता परततो... नेहमी सारखाच!